राज्यपालांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार मुंबई : राज्यपालांसारख्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने विचार करून बोलायला हवे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गोंधळ झाला. त्याला राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांची पार्श्वभूमी होती. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. राज्यपाल व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होत असतानाच शुक्रवारी विधान भवनात माध्यमांशी बोलताना, राज्यपालांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त केली. राज्यपाल हे एक मोठे पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना आपल्याकडे सगळय़ांचे लक्ष असते हे लक्षात ठेवावे आणि विचार करून बोलावे असे पवार म्हणाले.