मुंबई: मुंबईत दैनंदिन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जवळपास तिप्पट अधिक झाले आहे. गुरुवारी शहरात ५ हजार ७०८ रुग्णांचे नव्याने निदान झाले. तर १५ हजार ४४० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख स्थिर झाला असून नव्याने बाधित होणाऱ्याच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली असून २२ हजार १०३ पर्यत खाली आली आहे. शहरात नव्याने आढळलेल्या ५ हजार ७०८ रुग्णांपैकी ५५० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यातील ७९ रुग्णांना प्राणवायू लावावा लागला आहे. सध्या शहरात १२ टक्के खाटा भरलेल्या आहेत, तर उर्वरित खाटा रिक्त आहेत. शहरात गुरुवारी १२ रुग्णांचा मृत्यू झाला या सर्वांना दीर्घकालीन आजार होते. यातील दहा रुग्ण ६० वर्षावरील तर दोन रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. ठाणे जिल्ह्यात ३,२५२ ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार २५२ करोना रुग्ण आढळून आले. तर, आठ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ३ हजार २५२ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई १ हजार ११९, ठाणे ९९०, कल्याण-डोंबिवली ५०५, मीरा भाईंदर ३१८, अंबरनाथ १०८, उल्हासनगर ९८, बदलापूर ५६, भिवंडी ३७, ठाणे ग्रामीण क्षेत्रात २१ रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ मृतांपैकी कल्याण-डोंबिवली तीन, नवी मुंबई दोन तर ठाणे, मीरा भाईंदर आणि उल्हासनगर मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात ‘फेब्रुवारीमध्ये उच्चांक’ राज्यभरात करोना वेगाने त्सुनामीप्रमाणे पसरत असून ओमायक्रॉनमुळे हा प्रसार वाढल्याची शक्यता आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये तिसरी लाट उच्चांकावर आली असली तरी राज्यभरात मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उच्चांक गाठेल. डेल्टाच्या तुलनेत राज्यभरात ही लाट सौम्य असेल. परंतु अजूनही डेल्टाचा प्रादुर्भावही राज्यात असल्याने खबरदारी घ्यावी लागेल. प्रत्येक जीव महत्त्वाचा असल्यामुळे करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन योग्यरितीने करणे, लसीकऱण वाढवून आजाराची तीव्रता कमी राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.