मुंबई : मुंबईत रविवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे आढळले असून दैनंदिन रुग्णसंख्या साडे सात हजारांपर्यंत खाली आली आहे. रविवारी मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत चढ-उतार होत असल्याचे दिसून आले. परंतु मागील चार दिवसांमध्ये रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. शनिवारी शहरात १०,६६१ रुग्ण आढळले होते, तर रविवारी यात आणखी घट झाली. रविवारी एका दिवसात ७,८९५ रुग्ण आढळले आहेत. बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे दैनंदिन रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. रविवारी बाधित झालेल्या रुग्णांपैकी ७२२ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे, तर यातील १११ जणांनी प्राणवायूची आवश्यकता भासली आहे. मृतांच्या प्रमाणात काही अंशी वाढ मृतांच्या संख्येत शनिवारपासून काही अंशी वाढ झाली असून दहाच्यावर गेली आहे. शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस शहरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी नऊ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर १० रुग्ण ६० वर्षावरील होते. ठाणे जिल्ह्यात ५,६२५ रुग्ण ठाणे जिल्ह्यात रविवारी ५,६२५ नवे करोनाबाधित आढळून आले. तर चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. ठाणे शहरात १,६७३, नवी मुंबई १,६६५, कल्याण-डोंबिवली ८५६, मिरा-भाईंदर ५६२, ठाणे ग्रामीण ३३१, उल्हासनगर १८०, अंबरनाथ १५२, बदलापूर ११९ रुग्ण आढळून आले. राज्यात ४१,३२७ नवे बाधित मुंबई : राज्यात रविवारी ४१,३२७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ४०,३८६ रुग्णांनी या आजारावर मात केली, तर २९ जणांचा मृत्यू झाला. रविवारी पुण्यात आणखी आठ ओमायाक्रॉन बाधितांची भर पडल्याने राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता १७३८ झाली असून ९३२ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. राज्यात सध्या दोन लाख ६५ हजार ३४६ उपचाराधीन रुग्ण आहेत.