मुंबई : करोना रुग्णसंख्येचा आलेख आता घटू लागला असून, दिवसभरात ८९३ नव्या रुग्णांचे निदान झाले तर आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णसंख्या तिहेरी आकडय़ापेक्षा कमी होती. दिवसभरात मुंबईत ८९, नाशिक जिल्ह्यात ५४, पुणे शहरात १७४, उर्वरित पुणे जिल्ह्यात ७७, पिंपरी- चिंचवडमध्ये ६६, नागपूर जिल्ह्यात ४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात सध्या ७,८११ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत ८६ रुग्णांचे नव्याने निदान मुंबईत शनिवारी ८६ रुग्ण नव्याने आढळले असून दोन वर्षांमध्ये प्रथमच रुग्णसंख्या इतक्या खाली गेली आहे. तसेच शनिवारीही शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव शहरात वेगाने ओसरत असून पहिली किंवा दुसरी लाट ओसरल्याच्या काळात असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षाही कमी रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांमध्ये आढळत आहे. शनिवारी शहरात ८६ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून मागील दोन वर्षांत प्रथमच करोनाची लाट ओसरल्यावर इतकी कमी रुग्णसंख्या आढळली आहे. रुग्णसंख्येसह मृतांचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात घटले आहे. शनिवारी शहरात एकही मृत्यू झालेला नसून या महिनाभरात सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. याआधी पहिली लाट ओसरल्यावर डिसेंबर २०२१ मध्येही सात वेळा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती. ठाणे जिल्ह्यात ४० रुग्ण ठाणे जिल्ह्यात शनिवारी ४० करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी आढळून आलेल्या ४० करोना रुग्णांपैकी ठाणे १८, नवी मुंबई नऊ, ठाणे ग्रामीण पाच, उल्हासनगर तीन, कल्याण-डोंबिवली दोन, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि अंबरनाथमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.