मुंबई : मुंबईतील करोनाचा धोका टळू लागला असून गेल्या सलग नऊ दिवसांपासून मुंबईत करोनामुळे एकही मृत्यूची नोंद झाली नाही. शनिवारी ६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली असून सध्या संपूर्ण मुंबईत केवळ ५७६ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत शनिवारी ६५ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या १० लाख ५६ हजारांवर गेली आहे. नव्याने नोंदवलेल्या ६५ रुग्णांपैकी केवळ ८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्यापैकी पाच रुग्णांना प्राणवायूची गरज लागली आहे. तर दिवसभरात ८९ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९८ टक्क्यांवर गेले आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०१ टक्के आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी पाच हजार दिवसांच्या पुढे गेला आहे. मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण कमी होत असून शनिवारी दिवसाला १७,९५२ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील करोना रुग्णांसाठीच्या एकूण रुग्णशय्यांपैकी केवळ १.७ टक्के खाटा व्यापलेल्या आहेत. करोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत असून गेल्या ९ दिवसांपासून मुंबईत सलग शून्य मृत्यूची नोंद होत आहे. करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यापासून मुंबईत १५ वेळा दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद.झाली आहे. ठाणे जिल्ह्यात २५ रुग्ण दरम्यान, ठाणे जिल्ह्यात शनिवारी २५ करोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात शनिवारी आढळून आलेल्या २५ करोना रुग्णांपैकी ठाणे १३, नवी मुंबई सात, ठाणे ग्रामीण तीन, मिरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.