मुंबई : जानेवारीत करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर बुधवारी सलग दुसऱ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली. त्याआधी मंगळवारी शून्य मृत्यूची नोंद झाली होती. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२१मध्ये ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. बुधवारी मुंबईत २५५ नवे करोनाबाधित आढळले. त्यापैकी २३२ जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांची एकूण संख्या १० लाख ५४ हजार ७३२ वर पोहोचली आहे. बुधवारी ४३९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १० लाख ३३ हजार ७१ झाली आहे. सध्या मुंबईत २ हजार ११५ रुग्ण उपचाराधीन आहेत. मृतांची एकूण संख्या १६ हजार ६८५ झाली आहे. बुधवारी मुंबईत ३० हजार ३७१ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण १ कोटी ५८ लाख ९० हजार ५८७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान करोना रुग्णवाढीचा दर ०.०३ टक्के होता. रूग्ण दुपटीचा कालावधी २ हजार २० दिवसांवार गेला आहे. बुधवारी रुग्णांच्या संपर्कातील २ हजार ३१ जणांचा शोध घेण्यात आला.