मुंबई: वातावरणीय बदलामुळे सर्वासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आणि कडक उन्हाळा याबरोबरच दरडी कोसळण्यासारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर नरिमन पॉइंटचा ८० टक्के भाग, शहरातील अन्य चार ठिकाणचा ७० टक्के भूभाग पाण्याखाली जाण्याचा इशारा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयार केलेला मुंबई वातावरण कृती आराखडा हा पर्यावरणीय बदल व त्याचे दुष्परिणाम थोपवण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. त्यामुळे केवळ अन्य राज्यांनीच नव्ह तर देशाने मुंबईचे अनुकरण करावे, त्यातून एक चळवळ उभी राहील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले. मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई वातावरण कृती आराखडय़ाच्या लोकार्पण प्रसंगी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून ठाकरे बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार अरिवद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त आय.एस.चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते. निरोगी जगण्यासाठी चांगले वातावरण आवश्यक आहे. पण आपले जगणे सुसह्य करण्यासाठी ज्या सुविधा उभारतो, त्या उभारताना विकास करताना सर्वाधिक दुर्लक्ष पर्यावरणाकडे होते, असे प्रारंभीच स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणीय बदल आणि त्याच्या दुष्परिणामावर अनेकदा यावर चर्चा होते, परिसंवाद होतात, पण कोणी काही करत नाही. अशा परिस्थितीत पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम थोपविण्यासाठी पुढाकार घेऊन वातावरण कृती आराखडा तयार करणारी मुंबई ही देशातील पहिलीच महापालिका असून हा कृती आराखडा केवळ कागदावर न राहता कृतीत उतरला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हे शाप की वरदान याचा विचार करण्याची वेळ आली आहे. दिवसागणिक वस्ती वाढत आहे. त्यामुळे शहराच्या सुविधांवर ताण येत आहे. मुंबईला रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. या सुविधा देण्यासाठी पालिका कसोशीने काम करत आहे. मुंबईकरांना २४ तास पाणी देण्यास वचनबद्ध आहे. पण पाणी मिळविण्यासाठी जर आपण निरोगी आयुष्य गमावणार असू तर मग त्या पाण्याचा उपयोग काय. म्हणूनच गारगाई आणि पिंजाळ धरणांचा पुनर्विचार करताना समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यावर भर दिला जात असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांमुळेच बदल - चहल मुंबईत पूर येऊ लागल्यापासून पर्यावरणीय बदलाची चर्चा सुरू झाली, मात्र दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या अभावामुळे काही होऊ शकले नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळेच हा आराखडा तयार होऊ शकल्याचे पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.