मुंबई : उच्च न्यायालयाने कुणाल कामरा याला शुक्रवारी अटकेपासून दिलासा दिला. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरा याने केलेली याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना कामराविरोधातील तपास सुरू ठेवावा, परंतु, याचिका प्रलंबित असेपर्यंत कामरा याच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ नये. तसेच, त्याच्या जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर चेन्नई येथे जाऊन त्याचा जबाब नोंदवण्यात यावा, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.

कुणाल कामराने सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर आमदार मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलिसांनी कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती सांरग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने त्याच्या याचिकेवर शुक्रवारी निकाल देताना त्याची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आणि उपरोक्त आदेश दिले. त्याचवेळी, याचिका प्रलंबित असताना पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले गेल्यास संबंधित कनिष्ठ न्यायालयाने त्यावर कारवाई करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कामरा याने याचिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंधांशी संबंधित व्यापक आणि गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे, ते विचारात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, खार पोलीस ठाण्यात कामराविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला स्थगिती देऊ शकत नाही, असे न्यायालयाने कामरा याची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना प्रामुख्याने नमूद केले.

मुंबईत आल्यास हल्ल्याची भीती

कामरा याला समन्स पाठवण्यात आले होते. यानुसार, अटकेची कारवाई करणे पोलीस अधिकाऱ्याला आवश्यक वाटत नाही. परंतु, दखलपात्र गुन्हा घडल्याचा संशय असू शकतो. तसेच, कामरा याला मुंबईत आल्यास त्याच्यावर हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे, प्रकरणाचा तपास करणारे खार पोलीस तो गेल्या पाच वर्षांपासून राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचे म्हणणे नोंदवावे. खार पोलिसांनी तामिळनाडू पोलिसांची याप्रकरणी मदत घेऊन कामरा याचा जबाब नोंदवावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.