मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने झपाटय़ाने वाढ होत असल्याने मुंबई पोलिसांनी शहरामध्ये कलम १४४ लागू केलं आहे. आजपासून (३० डिसेंबर) पुढच्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ७ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळय़ा किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ वा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील मुंबईकरांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

“मुंबईकरांसाठी यंत्रणा सज्ज आहे, मात्र काळजी घ्यावी लागेल. विनामास्क घराबाहेर पडता कामा नये,” असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. मुंबईत नवा विषाणू असल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

“ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून यामध्ये अजिबात लक्षणं नसणारे जास्त आहेत. त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. काल आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयं जास्तीत जास्त भरण्यापेक्षा करोना सेंटरमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला असून, लक्षणं असणाऱ्या आणि नसणाऱ्यांना तिथे ठेवणार आहोत. यासाठी डॉक्टर, नर्सेस, औषधं, व्हेटिलेटर यांची गरज लागणार असून तयारी झाली आहे,” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेदेखीव वाचा – मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई; जाणून आदेशात काय म्हटलंय

संचारबंदी आहे मात्र हॉटेलमधून जाऊन पार्सल घेऊन आणण्यास परवानगी असेल असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. लॉकडाउनसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच नाही तर देशाच्या पंतप्रधानांचंही हेच मत असल्याचं मी ऐकलं आहे. अनेक राज्यांमध्ये जनताही आता कंटाळली असून त्यांना नियम पाळायचे नाहीत. लोक विनामास्क फिरत आहेत. पण त्यांनी असं करु नये अशी विनंती आहे. संसर्ग इतक्या वेगाने वाढेल की आपल्या सर्वांना फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल”.

“लोकांनी आणि मार्शल दोघांनी आपल्या हद्दीत राहिलं पाहिजे. मी मुंबईत फिरत असते, बाजूला गाडी लावून पाहत असते. अनेक नागरिक हल्ला करण्याच्या तयारीतच असतात. दोन्ही बाजूंनी नीट संवाद झाला पाहिजे. सगळेजण मास्क वापरत असतील तर मार्शलची गरजच भासणार नाही. पैसै कमावणं हे ध्येय नाही,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

पुढे त्यांनी म्हटलं की, “पोलीस ठाण्यात ज्या तक्रारी झाल्या त्याची पडताळणी केली तेव्हा बरेच जण मुंबईच्या बाहेरुन येणारे ही शिस्त बिघडवत आहेत. मी जुहू पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पाहिलं होतं. पण बाहेरुन या किंवा मुंबईकर असाल एकमेकांना सांभाळलं पाहिजे. जेव्हा मुंबईकरांना चुकीचं वाटतं तेव्हा मला फोन करतात. मार्शलची चुकी असते तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण हे निर्बंध हे फक्त मार्शलसाठी नाही. जनता सुरक्षित राहावी हेच आमचं ध्येय आहे”.

“मी कोणत्याही लग्नात जाणार नाही”

लग्नांमध्ये नेत्यांची उपस्थिती आणि गर्दीसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी कोणत्याही लग्नात, समारंभात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण दुसऱ्याला सांगणं आणि आपल्यासाठी नियम वेगळे असण्याची गरज नाही. महापौर म्हणून मी पालन करत असून कोणत्याही कार्यक्रमात, लग्नात गेलो तरी चेहऱ्यावर मास्क हवं. तसंच सॅनिटायझर आणि लसीकरण झालेलं असायला हवं. शिवेसना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सर्वांनीच नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पालन होत नसेल तर कारवाई करण्याची परवानगी पोलिसांना दिली आहेच”.