मुंबई : डिजिटल आशयाचा प्रभाव सध्या वाढता असल्याने येत्या काळात या उद्याोगाच्या आर्थिक उलाढालींमध्ये माध्यम प्रभावकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने प्रभावकांच्या माध्यमातून होणारा प्रचार-प्रसार लक्षात घेत त्यांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी सर्जनशील, नैतिक आणि कायदेशीर धोरण आखणे ही आजची गरज आहे, असा सूर ‘वेव्हज’ परिषदेंतर्गत झालेल्या माध्यम प्रभावकांच्या परिसंवादात उमटला.

परिषदेच्या शेवटच्या दिवशी ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया अॅडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लूएन्सर्स’ या विषयावरील परिसंवादात अभिनेत्री, माध्यम प्रभावक शिबानी दांडेकर – अख्तर, एएससीआयआयच्या संचालक सहेली सिन्हा, मयंक शेखर (पत्रकार), ‘पॉकेट एसेस’चे मुख्य व्यवसाय अधिकारी विनय पिल्लई आदी सहभागी झाले होते.

माहितीपूर्ण आशय सादर करण्यावर भर

● डिजिटल आशयाचा वाढता प्रभाव आणि त्या माध्यमातून जाहिरातीचे प्रमाण वाढत चालले असल्याने माध्यम प्रभावकांकडून येणारा आशय खरा असला पाहिजे, त्यांच्या कामात पारदर्शकता असावी आणि जबाबदारीने आशयनिर्मिती केली पाहिजे, असे मत या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले.

● डिजिटल माध्यमातून ठरावीक ब्रॅण्डच्या प्रचारासाठी आशयनिर्मिती करणाऱ्या प्रभावकांनी अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असे मत शिबानी दांडेकर अख्तर हिने व्यक्त केले. ज्या ब्रॅण्डची जाहिरात करत आहात त्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे, तो तुमच्या आशयातून प्रतिबिंबित होईल आणि पाहणाऱ्यांपर्यंत पोहोचेल, असे शिबानी यांनी स्पष्ट केले.

● डिजिटल आशयनिर्मिती करताना प्रत्येक प्लॅटफॉर्मची गरज वेगळी असते हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने गोष्टीची मांडणी करायला हवी, असे सांगतानाच प्रभावकांनी माहितीपूर्ण आशय सादर करण्यावर भर दिला पाहिजे, असे विनय पिल्लई यांनी सांगितले.

● डिजिटल आशयकर्ते आणि समाजमाध्यमांवरील सेलिब्रिटी यातली सीमारेषा धूसर होत चालली आहे. डिजिटल आशयकर्त्यांनी हे भान बाळगले पाहिजे. वैयक्तिक चॅनेलच्या माध्यमातून ब्रॅण्डिंग करतानासुद्धा आपण जी माहिती देतो आहे ती योग्य आहे ना हे तपासून घेतले पाहिजे. चुकीची माहिती लोकांपर्यंत जाणार नाही, याचीही काळजी प्रभावकांनी घेतली पाहिजे, असे मयंक शेखर म्हणाले.

● एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी करताना आपण त्या ब्रॅण्डशी आर्थिक व्यवहार केले असून ती निव्वळ जाहिरात आहे, हेही प्रभावकांनी स्पष्ट केले पाहिजे. प्रभावकांनी जबाबदारीने आशयनिर्मिती केली पाहिजे, असे मत सहेली सिन्हा यांनी व्यक्त केले. चुकीच्या माहितीमुळे लोकांची दिशाभूल होऊ नये आणि प्रभावकही कायदेशीर अडचणीत सापडू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शनही माध्यम प्रभावकांना मोठ्या प्रमाणावर दिले पाहिजे, असा आग्रही मुद्दा सहेली सिन्हा यांनी मांडला.

३० नवोद्यामींना गुंतवणूकदारांशी थेट संपर्क साधण्याची संधी

मुंबई. १ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘वेव्हज’ परिषदेच्या समारोपाच्या दिवशी मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील नवोद्यामींना थेट गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधी देणाऱ्या ‘वेव्हएक्स २०२५’ या खास उपक्रमाची माहिती देण्यात आली.

या उपक्रमाच्या माध्यमातून नवोद्यामी आणि गुंतवणूकदार यांना एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसंचालक आशुतोष मोहळे यांनी सांगितले.

वेव्हज परिषदेत या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्याअंतर्गत १ हजार प्रवेशअर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ३० नवोद्यामींना गुंतवणूकदारांसमोर आपल्या व्यवसायाची संकल्पना मांडण्याची संधी मिळाल्याची माहिती ‘इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया’चे (आयएमएआय) मुख्य विकास अधिकारी संदीप झिंग्रान यांनी दिली. या ३० नवोद्यामींपैकी निम्म्याहून अधिकांचे प्रस्ताव गुंतवणूकदारांकडून मान्य झाले, असेही त्यांनी सांगितले.

‘वॉर्मअप व्हेंचर्स’चे व्हेन्यू पार्टनर राजेश जोशी यांनी ‘गिगल’ या स्टार्टअपविषयी माहिती दिली. ऑनलाईन माध्यमातून होणारा लैंगिक छळ आणि बदनामी थांबवण्यासाठी या स्टार्टअपच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. अशापद्धतीचे समाजोपयोगी आणि जबाबदारीने कार्य उभारू पाहणाऱ्या नवोद्यामींना या उपक्रमातून संधी दिली जाणार आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले. तसेच या उपक्रमांतर्गत महिला नवोद्यामींचे प्रमाण तुलनेने कमी असल्याकडे लक्ष वेधत भविष्यात महिला उद्याोजकांचा या उपक्रमात सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे झिंग्रान यांनी सांगितले.