मुंबई : राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्थेकडील इनामी जमिनीची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केल्याप्रकरणी परतूर (जि. जालना) येथे नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी दिली. परतूर येथील दोन मशिदी या वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत. मात्र नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी यांनी संगनमत करून या इनामी जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री करुन गैरव्यवहार केल्याचे समोर आल्यानंतर नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.