केवळ चार वर्षांच्या कालावधीत टाटा समूहावरून पायउतार व्हावे लागणे आणि पुढे सन्मानासाठी सुरू झालेल्या दीर्घ न्यायालयीन लढय़ामुळे सायरस मिस्त्री यांची उद्यम कारकीर्द नाहक झाकोळली गेली. कुटुंबाच्या मालकीच्या बांधकाम व्यवसायात म्हणजे शापूरजी पालनजी अँड कंपनी लिमिटेडमध्ये १९९१ मध्येच, वयाच्या २३ व्या वर्षी मिस्त्री हे संचालक म्हणून दाखल झाले. तीन वर्षांनी ते व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाटय़ाने यशाचे शिखर गाठले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुस्वभावी, मितभाषी ४४ वर्षीय सायरस मिस्त्री यांच्या गळय़ात २०१२ साली टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची माळ पडली आणि त्यानंतरच खरे तर मिस्त्री हे प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आले. नावात ‘टाटा’ नसलेले ते टाटा समूहाचे दुसरे अध्यक्ष बनले आणि समूहाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांचे वारस म्हणून घोषित करण्यात आले. पाच जणांच्या निवड मंडळाने – ज्यात मिस्त्री स्वत: सहभागी होते – रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्यात जवळपास १५ महिने परिश्रम घेतले.

तथापि सायरस मिस्त्री हे कोणत्याही तऱ्हेने टाटा समूहात सामील झालेले बाहेरचे व्यक्ती निश्चितच नव्हते. उल्लेखनीय बाब म्हणजे, सायरस मिस्त्री यांच्या आजोबांनी १९३० मध्ये टाटा सन्समध्ये पहिल्यांदा भागभांडवल खरेदी केले होते, ज्याचा आज टाटा समूहातील सर्वात मोठे भागधारक म्हणून १८.५ टक्के इतका  हिस्सा आहे. टाटा समूहातील सूत्रधार कंपनी आणि मुख्यत: विश्वस्त संस्थेद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या टाटा सन्समधील ते सर्वात मोठे एकल भागधारक आहेत. त्याचेच प्रतिनिधित्व करीत २००६ सालापासून सायरस मिस्त्री हे टाटा सन्सवर संचालक म्हणून कार्यरत होते.

टाटा समूहात पदार्पण व गच्छंती

मिस्त्री यांच्या कार्यपद्धतीने खुद्द रतन टाटा यांनाही भुरळ पाडली आणि म्हणून त्यांनी त्यांचा विश्वासही संपादित केला. त्यामुळेच २०११ मध्ये एका निवेदनात रतन टाटा म्हणाले की, ‘त्यांची गुणवत्ता आणि क्षमता, त्यांची सूक्ष्म निरीक्षणे आणि त्यांची नम्रता यामुळे प्रभावित झालो आहे.’ सायरस मिस्त्री यांना निवड समितीकडून एकमुखाने पाठिंबा मिळाला आणि सुरुवातीला रतन टाटा यांच्याबरोबरीने काम करीत नंतर त्यांनी टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून सूत्रेही हाती घेतली. पुढे रतन टाटा यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना समूहाच्या अन्य कंपन्यांवरूनही बाजूला करण्यात आले. याबाबत त्यांनी न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उर्वरित कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या सदस्यपदाचा त्यांनी राजीनामा दिला.

सन्मानासाठी लढा 

उद्योग जगतातील अलीकडच्या काळात लक्षणीय ठरलेल्या टाटा-मिस्त्री वादंगाची दीर्घकालीन न्यायालयीन संघर्ष सुरू झाला. वेगवेगळय़ा न्यायाधिकरणांकडून आलेल्या वेगवेगळय़ा आदेशांनी कधी दिलासा, तर कधी निराशा मिस्त्री यांच्या पदरी आली. लक्षणीय गोष्ट म्हणजे, चालू वर्षांच्या सुरुवातीला मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने टाटा विरुद्ध मिस्त्री कायदेशीर प्रकरणात सायरस मिस्त्री यांची पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली. टाटा सन्सचे प्रमुख म्हणून सायरस मिस्त्री यांना हटवण्याच्या २०२१ साली दिल्या गेलेल्या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारी एसपी समूहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने मात्र, मार्च २०२१ च्या त्या निकालात सायरस मिस्त्री यांच्या विरोधात केलेल्या काही टिप्पणींना हटविण्याचे आदेश दिले.

मान्यवरांची आदरांजली..

सुप्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने सर्वानाच मोठा धक्का बसला असून विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आणि नि:शब्द करणारे आहे. देशातील एका मोठय़ा उद्यमशील घराण्यात जन्मून आपल्या कर्तव्य व कुशलतेने त्यांनी भारतीय उद्योग विश्वात आपला ठसा उमटविला होता. वडील पालनजी मिस्त्री यांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांचे निधन व्हावे, हा केवळ दैवदुर्विलास आहे. त्यांच्या निधनाने उद्योग आसमंतातील एक तेजस्वी तारा निखळला आहे.

भगतसिंह कोश्यारी । राज्यपाल

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबीयांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार : सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाने धक्का बसला. ते अतिशय उमदे, उत्तुंग आणि कर्तबगार उद्योगपती होते. उद्योग जगतात आपल्या कर्तृत्वाने चमकणारा तो एक तारा होता. तो आज आपण, गमावला.

एकनाथ शिंदे । मुख्यमंत्री 

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व माझे बंधुतुल्य सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. मिस्त्री कुटुंबाशी आम्हा सर्वाचे अतिशय जिव्हाळय़ाचे संबंध होते.

सुप्रिया सुळे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार

मिस्त्री यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगाने एक चमकता तारा गमावला आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. 

पीयूष गोयल। केंद्रीय उद्योगमंत्री

मिस्त्री यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून सहवेदना. त्यांना शांती लाभो. 

नितीन गडकरी । केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री

सायरस मिस्त्री हे देशातील सर्वात प्रतिभाशाली उद्योगपतींपैकी एक होते. त्यांनी भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

राहुल गांधी। काँग्रेस नेते

मिस्त्री हे एक चैतन्यशील आणि तेजस्वी उद्योजक होते. कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आपण गमावला आहे.

शरद पवार। अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

कुणाच्याही मृत्यूची योग्य वेळ वगैरे कधीच नसते, पण काही मृत्यू हे इतरांच्या मृत्यूपेक्षा अधिक अकाली असतात. कारकीर्दीचा उत्तम काळ सुरू होणार असताना वयाच्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणे हे अत्यंत दु:खद आहे. सायरस यांच्या कुटुंबाप्रति सहवेदना.

ओमर अब्दुल्ला । उपाध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyrus mistry profile cyrus mistry biography career journey of cyrus mistry zws
First published on: 05-09-2022 at 03:49 IST