मुंबई : ‘परचुरे प्रकाशन’ या सर्वात जुन्या आणि नामांकित प्रकाशन संस्थेचे संचालक नरेन परचुरे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, दोन मुले व विवाहित बहीण असा परिवार आहे. नरेन परचुरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. अतिशय उत्साही, कल्पक आणि तरुण लेखकांचा प्रकाशक मित्र म्हणून ओळखल्या गेलेल्या नरेन यांच्या अकाली निधनाने साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘परचुरे प्रकाशन’चे संस्थापक आणि पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे मालक अप्पा परचुरे यांचे पुत्र नरेन यांनी प्रकाशन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. नरेन यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नव्हती. त्यांच्यावर दोन महिने उपचारही सुरू होते, मात्र अवयव निकामी होत गेल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. ‘परचुरे प्रकाशन’ संस्था ही अनेक मोठय़ा लेखकांचे लिखाण प्रकाशित करणारी प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, जी. ए, कुलकर्णी अशा प्रख्यात लेखकांचे साहित्य प्रकाशित करत ‘परचुरे प्रकाशन’ने आपली एक अभिजात परंपरा निर्माण केली. मोठय़ा लेखकांशी जोडली गेलेली प्रकाशन संस्था म्हणून नरेन परचुरे यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. मात्र त्यांनी स्वत: व्यवसायाची सूत्रे हातात घेतल्यानंतर जुन्याबरोबरच नव्या लेखकांनाही जोडून घेण्याचा प्रयत्न केला. ९५ च्या सुमारास पदवीधर झालेल्या नरेन यांनी २००० साली ‘परचुरे प्रकाशना’च्या व्यवसायाची सूत्रे हातात घेतली. आपल्या वडिलांना ते आधीपासूनच व्यवसायात सहकार्य करत होते. गेली १० ते १५ वर्षे नरेन यांचे वडील अप्पा परचुरे यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर नरेन यांनी पूर्णपणे हा व्यवसाय सांभाळला. नव्या लेखकांचा, अप्रकाशित साहित्याचा शोध प्रसिध्दीच्या झोतापासून दूर असलेले, मात्र ज्यांच्याकडे समाजाला देण्यासारखे, सांगण्यासारखे ठोस काही आहे, अशा व्यक्तींना नरेन परचुरे शोधून काढत, त्यांची गाठभेट घेऊन त्यांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करत असत. नव्या लेखकांचा ते सातत्याने शोध घेत असत. मनोहर जोशी, नीला सत्यनारायण, डॉ. संजय ओक यासारख्या व्यक्तिमत्वांना लिहिते करण्याचे श्रेय नरेन यांना जाते. एकीकडे मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकरांसारख्या जुन्याजाणत्या लेखकांचे नवनवे साहित्य त्यांनी प्रकाशित केले. त्याचवेळी नव्या लेखकांनाही प्रोत्साहन दिले. आचार्य अत्रे यांचे अप्रकाशित साहित्य शोधून ते ‘अप्रकाशित अत्रे’ नावाने प्रकाशित करण्याची कल्पना नरेन यांचीच होती. अत्रे यांनी सुरू केलेली ‘नवयुग वाचनमाला’ नव्या संचात प्रकाशित करण्याची कल्पनाही त्यांची होती. ‘नवयुग वाचनमाले’चे सहा संच शाळा-शाळांमध्ये अवांतर वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. बालमोहन शाळेने हे संच अवांतर वाचन- अभ्यासासाठी मुलांना दिले.