मुंबई : शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाइलाजाने आणि दु:खाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. 

 कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजावून सांगून ते अमलात आणावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख येणार होते. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यातील छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांनी हे कायदे मान्य होते. एका छोट्या समूहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करीत होता, असे पाटील म्हणाले.

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीबरोबरच बाहेर हवे तिथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो आणि अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.