लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः गोरेगाव येथे कांदळवनाचा ऱ्हास करून जमिनी बळकावल्याप्रकरणी बोरिवली तहसीलदार कार्यालयाकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. दोन गुन्ह्यांमध्ये १५ जणांना आरोपी करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
बोरिवली येथील तहसीलदार कार्यालयात कार्यरत मंडळ अधिकारी आशिष चव्हाण यांना प्राप्त तक्रारीवरून त्यांनी स्वतः पहाडी गोरेगाव परिसराची पाहणी केली. त्यावेळी तेथील तिवरांच्या झाडांवर व दलदलीच्या ठिकाणी भराव टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चव्हाण यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार स्थानिक बांगुर नगर पोलिसांनी याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ (१) (२) अंतर्गत बुधवारी गुन्हा दाखल केला. कांदळवनापासून ५० मीटर अंतरावर कोणतेही विकासकाम करू नये, असे न्यायालयाचे आदेश असल्यामुळे याप्रकरणी तहसीलदार कार्यालयाकडून तक्रार करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ॲप्लिकेशनवर तक्रारीवरून पाहणी
पहाडी गोरेगाव परिसरातील तिवरांच्या झाडांवर भराव टाकण्यात आल्याची तक्रार मँग्रोव्ह सुरक्षा ॲपवर आली होती. त्याती पडताळणी करण्यासाठी तक्रारदार चव्हाण घटनास्थळी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत वनरक्षक होते. तेथे भराव टाकून पाच भूखंड निर्माण करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यापैकी एका भूखंडावर निळ्या रंगाचे पत्रे लावण्यात आले होते, तसेच भराव खूप जून असल्याचे पाहणीत निदर्शनात आल्याचे चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्या ठिकाणी एक धार्मिक स्थळ होते. तसेच दोन भूखंडांवर माती टाकण्यात आली होती. त्या ठिकाणी बाजूला दोन लोखंडी केबिन होत्या. तसेच त्याच्या शेजारी तीन जुन्या झोपड्या होत्या. त्या ठिकाणी भराव टाकून दलदलीचा भाग बुजवण्यात आला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. तेथील भूखंडावर नोंदी असलेल्या विठ्ठलभाई पटेल, सरेश कावा, हर्षद कावा, खुशाल कावा, ललीताबेन कावा व तेथील आश्रमाचे विश्वस्त यांच्याविरोधात बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी एका प्रकरणात ९ जणांविरोधात गुन्हा
चव्हाण यांना मँग्रोव्ह सुरक्षा ॲपवरून प्राप्त आणखी एका तक्रारीवरून त्यांनी पहाडी गोरेगाव परिसरात पाहणी केली. त्यावेळी तेथे वाहन दुरूस्तीचे गॅरेज उभारण्यात आल्याचे, तसेच अनेक ठिकाणी भराव टाकल्याचे निदर्शनास आलेले. जुन्या तुटलेल्या लाद्यांच्या साह्याने भराव टाकण्यात आला होता. तेथे कचराकुंडीही उभारण्यात आली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्या तक्रारीवरून शंकर गुप्ता, संजय धाडवा, रमणिकलाल शहा, विजय निसार, हितेश देढिया, नीरव देढिया, जगदिश सोनी, लादी विक्री दुकानाचा मालक, डी. डी. कोठारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे तहसीलदार कार्यालयाकडून याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.