ऊस दरवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी ऐन दिवाळीत त्यांच्यावर गोळीबार करून आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नाचा भाजपाने निषेध केला असून शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे नेते शेतकरीविरोधी धोरण राबवित असून न्याय मागण्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी पोलीस गोळीबाराला बळी पडत आहेत. मावळ असो की सांगली, सरकार शेतकऱ्यांना चिरडण्याचे धोरण राबवित आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.