गायत्री हसबनीस, लोकसत्ता मुंबई: करोनामुळे लागू र्निबध शिथिल होताच कार्यालये सुरू झाली असून टाळेबंदीच्या काळात भाडय़ाने घेतलेले लॅपटॉप ग्राहकांनी विक्रेत्यांना परत करण्यास सुरुवात केली आहे. आता लॅपटॉप भाडय़ाने घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. जवळपास ९० टक्के ग्राहकांनी विक्रेत्यांना लॅपटॉप परत केले आहेत. टाळेबंदी आणि त्यानंतर लागू निर्बंधांच्या काळात कडक नियमांमुळे कार्यलयात जाणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे कार्यालयीन काम घरातून करण्याकडे कल वाढू लागला होता. अनेक कर्मचाऱ्यांनी दीर्घ काळासाठी लॅपटॉप भाडय़ाने घेण्यास सुरुवात केली होती. परंतु तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात होताच लॅपटॉप भाडय़ाने घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. करोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन गेल्यावर्षी दिवाळीनंतर ग्राहकांनी भाडय़ाने घेतलेले लॅपटॉप विक्रेत्यांना परत करण्यास सुरुवात केली होती. सध्या कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे कार्यालयातील संगणकाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे भाडय़ाने घेतलेल्या लॅपटॉपची आवश्यकताही कमी झाली आहे. ‘‘टाळेबंदीत लॅपटॉपची तातडीची गरज होती. कार्यालये सुरू झाल्यामुळे आता त्याची गरज नाही. काही सादरिकरण करायचे असेल तरच लॅपटॉपची भासते. कार्यालय नियमित सुरू झाले आहे. त्यामुळे कार्यालयाचे संपूर्ण काम तेथील संगणकावरच करण्यात येते. त्यामुळे लॅपटॉप भाडय़ाने घेण्याचीही गरज नाही’’, असे एका बडय़ा कंपनीत कार्यालय प्रशासक म्हणून काम करणाऱ्या दिप्ती भोसले यांनी सांगितले. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लॅपटॉप भाडय़ाने घेण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वी पाच ते सहा लॅपटॉप आम्ही भाडय़ाने देत होते. आता एखादा लॅपटॉप भाडय़ाने घेऊन जातात, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. टाळेबंदीच्या काळात दर महिना सुमारे दोन हजार ५०० ते तीन हजार रुपये भाडय़ाने ग्राहक लॅपटॉप घेत होते. पण आता दीड हजार रुपये भाडय़ानेही कोणीच लॅपटॉप घेण्यास तयार नाहीत. ग्राहक केवळ चौकशी करतात, परंतु लॅपटॉप भाडय़ाने घेत नाहीत, अशी माहिती लॅिमग्टन रोड येथील विक्रेते दिलीप कोकाटे यांनी दिली. कालावधीतही घट ‘‘सध्या कार्यालये सुरू झाल्याने भाडय़ाने घेतलेले लॅपटॉप जवळपास सर्वानीच आम्हाला परत केले आहेत. टाळेबंदीत त्यांना भाडय़ाच्या लॅपटॉपची गरज होती. पण कार्यालये सुरू झाल्याने भाडय़ाच्या लॅपटॉपची गरज राहिलेली नाही. पूर्वी तीन महिन्यांसाठी लॅपटॉप भाडय़ाने घेण्यात येत होते. पण आता गरजेपोटी काही दिवसांसाठीच लॅपटॉप भाडय़ाने घेतले जात आहेत मात्र ते प्रमाणही कमी आहे, असे डोंबिवली येथील संगणक-लॅपटॉप विक्रेते नितिन शेठ यांनी सांगितले.