दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना बुऱ्हानुद्दिन यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी मलबारहिल येथे आणि रिपब्लिकन नेते नामदेव ढसाळ यांच्यावर अंत्यसंस्काराच्या वेळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत झालेल्या चेंगराचेंगरीची प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.
सय्यदना यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लाखो अनुयायी येतील, याची कल्पना पोलीस अधिकाऱ्यांना असणे गरजेचे होते. पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी ती नि:पक्षपाती होण्यासाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून झाली पाहिजे, असे तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले.