केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे देशातील फुटिरतावादी, नक्षलवादी या सगळ्यांनाच आर्थिक चणचण भासू लागली आहे, खासकरून जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेत्यांकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे असंही जेटली यांनी नमूद केलं आहे. तसंच दहशतवादी कारवाया नियंत्रणात येण्याचं मुख्य कारण हे ‘टेरर फंडिग’ ला नोटाबंदीचा बसलेला जबरदस्त फटका हेच आहे असंही जेटली यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. ज्यानंतर १ हजार आणि ५०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या, याच निर्णयाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मागील वर्षी नोटाबंदीचा निर्णय होण्याआधी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात होती, आता ही संख्या अवघी २०-२५ वर आली आहे. मुंबईत भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अरूण जेटली बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हजेरी होती.

नोव्हेंबर २०१६ च्या आधी काळा पैसा देशातील अनेकांजवळ होता, मात्र हाच काळा पैसा रोखण्याचं काम नोटाबंदीच्या एका निर्णयामुळे झालं. सगळा पैसा औपचारिकपणे बँक यंत्रणांच्या अधिपत्याखाली आला. या निर्णयामुळे फुटिरतवादी, दहशतवादी, नक्षलवादी या सगळ्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं हे यश आहे असंही जेटली यांनी म्हटलं आहे.

आपल्या देशात जागतिक दर्जाच्या सामाजिक संस्था तयार झाल्या पाहिजेत. अशा संस्था तयार झाल्या तर गोरखपूरसारख्या दुर्दैवी घटना देशात होणार नाहीत, देशातलं भाजपचं सरकार ७.५ टक्के विकासदरामुळे खुश नाही हा विकासदर वाढवणं हे आमचं लक्ष्य आहे. यापुढेही आम्ही देशाचा विकास दर वाढविण्यासाठी जे योग्य असतील असे निर्णय घेऊ, असंही जेटली यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारतर्फे जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. नोटाबंदी, जीएसटी, दिवाळखोरीवर नवा कायदा हे आणि यांसारखे अनेक निर्णय मोदींनी घेतले ज्याचा फायदा आता देशाला होऊ लागला आहे असंही जेटली यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonetisation has left maoists j k separatists fund starved arun jaitley
First published on: 20-08-2017 at 21:07 IST