Deven Bharti Appointed as Commissioner of Mumbai Police : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे आज ( ३० एप्रिल ) सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होतं. आता देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल यांचीही नावे चर्चेत होती. अखेर आता देवेन भारती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत देवेन भारती?
देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत.
देवेन भारती यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
४ जानेवारी २०२३ रोजी देवेन भारती यांची मुंबई पोलिस दलाच्या इतिहासातील पहिल्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून सर्व सहपोलीस आयुक्त त्यांना अहवाल देतात, तर ते मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल देतात.
देवेन भारती यांनी यापूर्वी सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), अतिरिक्त पोलीस महासंचालक (दहशतवाद विरोधी पथक) आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांसारख्या महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत.
जेडे यांच्या हत्येच्या प्रकरणात बजावली महत्त्वाची भूमिका
डिसेंबर २०२२ मध्ये ते सहपोलीस आयुक्त (वाहतूक) म्हणून कार्यरत होते. देवेन भारती यांचा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सहभाग होता. त्याचबरोबर मिड-डे वृत्तपत्राचे वरिष्ठ गुन्हे संपादक जे. डे यांच्या हत्येच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यात त्यांचे योगदान मानले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख
देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना (२०१४ ते २०१९) या कालावधीत त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना वाहतूक विभाग आणि सुरक्षा महामंडळासारख्या तुलनेने कमी प्रभावी पदांवर नियुक्त केलं गेलं. शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईत विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद निर्माण केले, ज्यावर भारती यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीमुळे पोलीस खात्यात आणि राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती.
देवेन भारती यांच्याबाबतचा वाद काय?
महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारच्या काळात, भाजपा नेते हैदर आझम यांच्या पत्नीविरुद्ध खटला सुरू करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल भारती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता, आझम यांच्या पत्नीवर पासपोर्ट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप होता. तरीही, पोलीस तपासात कोणतेही पुरावे आढळले नाहीत आणि भारतींचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला नाही, त्यावरुन वाद निर्माण झाला होता.