निर्भया पथकासाठी नियोजित निधीतून खरेदी करण्यात आलेली वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावरून विरोधकांनी शिंदे-भाजपा सरकार चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसत्ताच्या 'लोकसंवाद' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरही स्पष्टपणे उत्तरं दिली. नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? “निर्भया पथकातील वाहने मंत्र्यांच्या सुरक्षा पथकात सहभागी करण्याच्या निर्णय आमच्या सरकारने घेतला नव्हता. यापूर्वीच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या सर्व गाड्या निर्भया पथकाला परत केल्या. या गाड्यांचा समावेश मंत्र्यांच्या सुरक्षा पथकात करण्याचा निर्णय मे महिन्यातच घेण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आम्हाला दोष देण्यात काही अर्थ नाही”, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हेही वाचा - VIDEO : ‘महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातलाच का जातात?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले, “पंतप्रधान मोदींचं…” “आधीच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या सुरक्षा पक्षकातही या या गाड्यांचा समावेश होता. तसेच ज्यांचा मंत्रीमंडळाशी संबंध नव्हता. त्यांनादेखील ही सुरक्षा देण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला. मुळात निर्भया पथकातील वाहने मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरू नये, असं आमचं मत आहे. मात्र, हा निर्णय मागच्या सरकारमध्ये घेण्यात आला. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही”, असेही ते म्हणाले. हेही वाचा - MVA Mahamorcha: “महाविकास आघाडीच्या मोर्चापेक्षा आमच्या…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोचक टीका पुढे बोलताना त्यांनी राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्यावरूनही महाविकास आघाडीवर टीका केली. “जे उद्योग बाहेर गेले त्यांना अडीच वर्षात वाईट वागणूक मिळाली. याबाबत ते जाहीरपणे बोलणार नाहीत. मात्र, तुम्ही त्यांना कधी खासगीत विचारलं तर ते याबाबत तुम्हाला सविस्तर सांगतील”, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी गुजरातला प्रधान्य देतात, या आरोपावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “पंतप्रधान मोदींचं केवळ गुजरातवर प्रेम असतं, तर २०१५ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र उद्योगात नंबर एकवर राहिला नसता. यादरम्यान, गुजरातला मागे टाकून आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो”, असं ते म्हणाले.