मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव नगरीला न देण्याच्या अट्टहासातून कविवर्य कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. आमचे आदर्शच अपमानित होत असतील, तर साहित्य संमेलनास का जायचे, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल फडणवीस यांनी केला. नाशिक ही स्वा. सावरकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाटय़ संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषविलेले होते. पण तरीही स्वा. सावरकरांचे नाव नगरीला न देण्याच्या अट्टहासातून कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर असून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.