मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करून पक्षहितासाठी त्याग व समर्पण केले. त्यांनी पक्षाकडे कधीही कोणतेही पद मागितले नाही, असे प्रतिपादन भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केले. पुढील काळात राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, असे सूचक भाकीत शेलार यांनी केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देवून फडणवीस यांचा पत्ता कापला गेला आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले, आदी घडामोडींबाबत शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दूरध्वनी केला आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची घोषणा केली. या नेत्यांसाठी त्याग करण्यास पक्षाचा कार्यकर्ता नेहमी तयार असतो. अमित शहांशी सख्य नसल्याने फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद गेले, या चर्चेबाबत विचारता त्यात तथ्य नसून सर्व रणनीती शहा, फडणवीस व शिंदे यांनी चर्चेतून ठरविली होती. राज्यात आतापर्यंत जे घडले आहे, हा ट्रेलर असून चित्रपट अजून बाकी आहे.