मुंबई : मुंबईला माफियांच्या व लुटारूंच्या ताब्यातून मुक्त करायची आहे, असा शिवसेनेवर हल्ला चढवीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा आता यापुढे मुंबईच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू राहील, अशी गर्जना केली.  मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपने शक्तिप्रदर्शन केले. त्यात भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणिशग फुंकले. या सभेत देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य भाषण झाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांनाच लक्ष्य केले.

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, आता तुम्ही म्हणजे हिंदूत्व नाही,  तुमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे, तुमचे मंत्री तुरुंगात गेले, त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याचे फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका़स्त्र सोडले.

बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात आता हनुमान चालिसा म्हटले की, राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मग तुम्ही कुणाच्या बाजूचे आहात रामाच्या की रावणाच्या असा सवाल त्यांनी ठाकरे यांना उद्देशून केला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी टीकेची झोड उठविली. शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे, वीज जोडण्या तोडल्या जात आहेत, भारनिमन आहे, करोनाकाळात या सरकारने बिल्डर, बारमालक यांना मदत केली, परंतु सामान्य माणसांना वाऱ्यावर सोडले. उद्धव ठाकरे आमच्यावर तुटून पडण्याची भाषा करतात, परंतु हिंमत असेल तर त्यांनी भ्रष्टाचारावर तुटून पडावे, असे सांगत, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही लढा पुकारला आहे.  मुंबईच्या स्वातंत्र्यासाठी आता संघर्ष सुरू राहील, अशी गर्जना फडणवीस यांनी केली. त्यावर महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा डाव असा आरोप केला जाईल, परंतु मुंबईच्या स्वातंत्र्याचा लढा म्हणजे मुंबईला माफिया व लुटारूंच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आमचा संघर्ष असेल, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिले.  या वेळी प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अ‍ॅड. आशीष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची भाषणे झाली. आमदार अतुल भातखळकर यांनी सूत्रसंचालन केले.

१४ मेनंतर पोलखोल सभा

आजची सभा ही पोलखोल सभा नाही. १४ मेनंतर मी तशी सभा घेणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी त्यानंतर सभा घेण्याची घोषणा केली.