राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर राज्य सरकारशी तडजोड करण्यासाठी आपण दबाव आणला नाही, असे संजय पांडे यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंग यांच्या अर्जावर सुनावणी सुरू असून महाराष्ट्र सरकारलाही उत्तर दाखल करावे लागणार आहे.

पांडे म्हणाले, “परमबीर सिंग यांनी स्वत: माझ्याशी संपर्क साधला होता आणि सांगितले होते की ते खूप तणावात आहेत आणि त्यांना हे प्रकरण संपवायचे आहे. त्यासाठी त्यांनी मदत मागितली होती. त्यानंतर मी त्यांच्याशी बोललो. मला हे प्रकरण संपवण्यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश मिळाले नव्हते. तसेच मी स्वतःहून हे प्रकरण संपवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. परमबीर सिंगांनी पूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतला आहे.”

यापूर्वी २ डिसेंबर रोजी राज्य सरकारने परमबीर सिंग यांच्यावर दाखल गुन्ह्यांसाठी आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना निलंबित केले होते. त्यांच्यासह इतर आरोपी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. सिंग यांच्या काळात पराग मणेरे हे ठाणे आणि मुंबईचे डीसीपी होते.