मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे काम एका उद्योगपतीला केवळ पाच हजार कोटी रुपयांना कसे काय दिले, त्याला आधार काय, असे सवाल करीत या सर्व प्रकरणांत काही तरी गौडबंगाल आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.दादर येथील टिळक भवन या प्रदेश काँग्रेस मुख्यालयात माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी भाजप सरकारने धारावीची मोक्याची व मौल्यवान जमीन केवळ पाच हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीच्या घशात घातली आहे. त्यासाठी कोणती निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली, राज्य सरकारने इतक्या अचानकपणे ही प्रक्रिया कशी पार पाडली, या प्रकल्पासाठी दुबईच्या सी-लिंक कंपनीने ७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा भरली होती, मात्र नंतर सरकरने ती रद्द केली. या पाठीमागे काही गौडबंगाल आहे का, असे काही प्रश्न समोर आले आहेत. मुंबईतील मोक्याच्या जमिनी एकाच उद्योगपतीला देऊन मुंबई लुटण्याचा भाजपचा डाव आहे. मुंबई विमानतळ याच उद्योगपतीच्या घशात घातले आहे. आता मुंबईतील कोळीवाडय़ांच्या जमिनीही उद्योगपतीला देतील. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे सर्व काही उद्योपतीच्या हितासाठी काम करीत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.