‘शिवराज अष्टक’ या चित्रपट श्रृंखलेतून शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी धडपडणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लांजेकर यांना हा पुरस्कार प्रदान केला.आद्य संगीताचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या घराण्याचा आशीर्वाद म्हणून ‘विश्वरूप कन्सेप्ट डेव्हलपर्स’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटतर्फे लांजेकर यांना ‘गुरुकुल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मावळातील कुसगाव येथील पीबीए फिल्मसिटीत लांजेकर यांच्या ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. तिथेच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. नरवीर तानाजी मालूसरे यांच्यावर आधारित चित्रपटात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वयाच्या नव्वदीत असताना लांजेकर यांनी चित्रपटात दिलेली भूमिका मोठ्या आनंदाने साकारत आहे’, अशा शब्दांत राजदत्त यांनी आपला आनंद व्यक्त केला. हेही वाचा >>>मुंबई : बनावट क्रमांकाचा वापर करून रिक्षा चालविणारे दोघे अटकेत “वेगवेगळी आव्हाने, अनेक अडचणीतून मार्ग काढताना माझ्यासह संपूर्ण युनिटलाच या ‘गुरुकुल’ पुरस्काराने मोठी उमेद, ऊर्जा मिळेल”, असे मनोगत लांजेकर यांनी व्यक्त केले. आतापर्यंत दिग्पाल लांजेकर यांनी 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या शिवराज अष्टकातील चार यशस्वी चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे शिवकालीन इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे.