लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : सध्या अनेक नामांकित बहुपडदा चित्रपटगृहांनी त्यांच्या चित्रपडद्यांची संख्या कमी करण्याचे धोरण अवलंबले आहे. एकपडदा चित्रपटगृहांचे अस्तित्व संपवण्यासाठी कारणीभूत ठरलेली बहुपडदा चित्रपटगृहे स्वत:च त्यांच्या बिघडलेल्या आर्थिक गणितांसाठी जबाबदार ठरली आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केले. खरे तर छोट्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी कमी आसन क्षमता असलेल्या बहुपडदा चित्रपटगृहांचा घाट घालण्यात आला होता, मात्र स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नामांकित चित्रपटांच्याच मागे लागल्याने आज मोठ्या चित्रपटगृहांवर ही वेळ आली आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले.
‘चित्रपताका’ या राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात ‘शाहिद’, ‘अलिगढ’ ते ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ सारख्या प्रसिध्द चित्रपट – वेबमालिकांचे दिग्दर्शक हंसल मेहता यांची खास मुलाखत घेण्यात आली. प्रसिध्द अभिनेते, कवी किशोर कदम यांनी हंसल मेहता यांना त्यांच्या चित्रपट प्रवासाविषयी बोलते केले. हिंदीमध्ये मोठमोठे कलाकार आणि त्यांच्या नामांकित चित्रपटांचेच वर्चस्व असताना सातत्याने कमीतकमी निर्मिती खर्चात छोटेखानी, मात्र उत्तम आशय असणारे चित्रपट देत टिकून राहण्याची किमया कशी साधली?, या प्रश्नाला उत्तर देताना दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी मोठमोठे कलाकार आणि अवाढव्य निर्मिती खर्चाची गरज नसते, असे स्पष्ट मत हंसल मेहता यांनी व्यक्त केले.
भरपूर पैशात चित्रपट बनत नाहीत, त्यातून फक्त मोठमोठे प्रकल्प उभे राहतात, असे त्यांनी सांगितले. आजपर्यंत मनोज वाजपेयी, राजकुमार राव, प्रतीक गांधी यांच्यासारख्या मोजक्याच आणि रंगभूमीवरून आलेल्या तुलनेने नवीन कलाकारांना घेऊन हंसल मेहता यांनी चित्रपट केले आहेत. अशा पध्दतीने चित्रपट बनवताना साहजिकच निर्माते मिळवणे हे अवघड असते. मात्र गेल्या काही वर्षात चित्रपटाची तयारी करत असताना अशा पध्दतीने निर्मिती खर्च आणि कलाकार यांची सांगड घालतो की आपसूकच निर्मातेही तयार होतात आणि माझ्या पध्दतीने मला गोष्ट सांगता येते, असा अनुभव हंसल मेहता यांनी सांगितला.
‘बहुपडदा चित्रपटगृहांची निर्मितीच मुळी छोटेखानी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी झाली होती’, असे मेहता यांनी सांगितले. ‘मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी साहजिकच एकपडदा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत होती. त्या चित्रपटगृहांची आसन क्षमताही मोठी असते, अशा ठिकाणी छोटेखानी चित्रपटांसाठी प्रेक्षकांची गर्दी जमवणे कठीण जात होते. त्यामुळे छोट्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी एकाच ठिकाणी २०० ते ५०० आसन क्षमता आणि तीन – चार चित्रपडदे असलेली बहुपडदा चित्रपटगृहे २००० साली अस्तित्वात आली. मात्र बहुतांशी बहुपडदा चित्रपटगृहे मॉलमध्ये होती. मॉलमध्ये अनेक नामांकित ब्रॅण्ड्सच्या शो रुम्सना लोकांची गर्दी होते, या ब्रॅण्ड्सच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बहुपडदा चित्रपटगृहांनीही शाहरुख खान, आमिर खान यांच्यासारख्या मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांचा आधार घ्यायला सुरुवात केली.
बहुपडदा चित्रपटगृहांनी छोट्या चित्रपटांऐवजी मोठे चित्रपट लावायला सुरूवात केल्याने एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायावर परिणाम झाला. तिथली प्रेक्षकांची गर्दी बहुपडदा चित्रपटगृहांकडे वळली. मात्र, या सगळ्यात बहुपडदा चित्रपटगृहांचा मुळ उद्देश बाजूलाच पडला’, असे त्यांनी सांगितले. बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये छोटे चित्रपट दाखवताना आमच्यासारख्या चित्रपटकर्मींना तिकिटाचे दरही कमी करता येत नाहीत, त्यामुळे साहजिकच ते चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक भरपूर पैसे देऊन चित्रपटगृहात येत नाहीत. मोठे चित्रपटही सध्या चालत नसल्याने बहुपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायावरही परिणाम झाला असल्याचे मेहता यांनी सांगितले.