मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच, ‘‘राजकारणात कायम कोण कुणाचा शत्रू व कोण कुणाचा मित्र नसतो’’, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने एका वेगळय़ाच राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. १९९९ पासून काँग्रेस ते आता शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याच्या राजकीय घडोमोडींचा धावता आढावा त्यांनी घेतला, परंतु याचा वेगळा अर्थ काढू नये, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर, विधान भवनात माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. त्याचबरोबर एसटी संप, नवाब मलिक यांच्यावरील कारवाई, आमदारांना घरे देण्यासंबंधीची घोषणा, राज्यपालांची परवानगी न मिळाल्यामुळे प्रलंबित राहिलेली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आदी विविध मुद्यांवर आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी परखड भाष्य केले. १७ विधेयके मंजूर या अधिवेशनात एकूण १७ विधेयके मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. विशेष म्हणजे गोंधळात विधेयके मंजूर केली नाहीत, तर, सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा करून ती मंजूर केली आहेत, असे ते म्हणाले.