मुंबई : मुंबई महापालिकेतील सर्व खातेप्रमुख आणि अधिकाऱ्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीच तसे आदेश काढले आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून त्यात प्रसार माध्यमांचीही मुस्कटदाबी उघडउघड सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणुका वारंवार लांबणीवर पडत असल्यामुळे प्रशासक राजवट स्थिरस्थावर झाली आहे. आधीच महासभा, पालिकेच्या विविध समित्यांच्या सभा होत नसल्यामुळे लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व्यासपीठ नसताना आता प्रसारमध्यमांचीही गळचेपी प्रशासनाने सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त या दर्जापेक्षा कमी दर्जाचा कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास प्राधिकृत नाहीत, अशा आशयाचे पत्रक प्रशासकांनी जनसंपर्क विभागामार्फत काढले आहे. प्रशासकीय राजवटीत अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या कारभाराबद्दल व राजवटीविरोधात महाविकास आघाडीतील सर्व माजी नगरसेवकांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच तक्रार केली होती. कोणती कंत्राटे, कोणाला, किती किमतीला दिली जातात याची कोणतीही माहिती कुठेही पारदर्शकपणे दिली जात नाही. अनेकदा अतिरिक्त आयुक्त व आयुक्त प्रसारमाध्यमांचे दूरध्वनी उचलत नाहीत, भेटीसाठी वेळ देत नाहीत, उत्तर देत नाहीत. तर विभागप्रमुख, खाते प्रमुखही नावासह माहिती देण्यास घाबरतात. त्यातच आता काढलेल्या या पत्रकामुळे प्रसारमाध्यमांमध्ये नाराजीची सूर आहे. पत्रकात काय? मुंबई महापालिकेद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध नागरी सुविधा, उपक्रम यांचे अनुकरण अन्य महापालिका करत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या योजना, उपक्रम, आपत्कालीन घटना यांची माहिती सारासार विचार करून देणे आवश्यक आहे. परंतु आयुक्तांच्या आदेशाशिवाय विभाग व खाते प्रमुख प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती देतात. त्यामुळे उलटसुलट माहिती प्रसारित होऊन पालिकेच्या प्रतिमेस धक्का पोहोचतो. म्हणून यापुढे कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी फक्त पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त हेच सक्षम प्राधिकारी असतील.