डॉ. अन्वय मुळे यांच्याशी आज वेबसंवाद; शंका आणि समस्यांचे निराकरण मुंबई : ‘अँजिओप्लास्टी’, ‘अँजिओग्राफी’, ‘बायपास’ हे शब्द आता फारसे नवे राहिलेले नाहीत. वाढत्या हृदयविकारांमुळे पर्यायाने हृदयावरील शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतरही हा विकार आटोक्यात ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणे तेवढेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आहार-विहारासह जीवनशैलीमध्ये यासाठी कोणते बदल करावेत याचे मार्गदर्शन विख्यात हृदयशल्यविशारद डॉ. अन्वय मुळे आज करणार आहेत. ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादात ‘ठणठणीत हृदयासाठी’ या विषयावर आज डॉ. मुळे संवाद साधतील. एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे हे कार्डिओथोरॅसिक सर्जन असून २०१५ साली त्यांनी मुंबईतील पहिली यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आहे. हृदयविकार किंवा हृदयशस्त्रक्रिया याबाबत अद्यापही भीतीच अधिक आहे. हृदयविकाराचे अनेक प्रकार असून त्यानुसार शस्त्रक्रियांसह अनेक अद्यावत उपचार सध्या उपलब्ध आहेत. हे उपचार कितपत सुरक्षित आहेत, या उपचारानंतरही पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगता येईल का, अशा अनेक शंकांचे निरसन आजच्या वेबसंवादात डॉ. मुळे करणार आहेत. हृदयविकाराचे निदान करण्यासाठी अनेक चाचण्या सध्या उपलब्ध आहेत. मात्र निदान लवकर होण्यासाठी शरीरात होत असलेले बदल किंवा जाणवत असलेली लक्षणे बारकाईने लक्षात घेणे गरजेचे आहे. अनेकदा लक्षणे दिसूनही तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आजार बळावतो. या तपासण्या महत्वाच्या का आहेत, तपासण्या करताना काय काळजी घ्यावी याची माहिती घरबसल्या जाणून घेण्याची संधी बुधवारी आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादात वाचकांना मिळेल. कधी ? : आज सायंकाळी ५ वाजता सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक.