मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या वळवाच्या पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी अनेक भागांतील नागरिकांना या पावसानेही मेटाकुटीला आणले. त्याचवेळी पालिकेच्या नालेसफाईचे दावे पोकळ असल्याचेही उघडकीस आले आहे. पूर्व उपनगरांतील अनेक भागांत नाल्यांजवळील वस्त्यांमध्ये, अनेक रस्त्यांवर नाल्याचे पाणी शिरले. मात्र, गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, शीव, साकीनाका, कांदिवली, दहिसर, अंधेरी – घाटकोपर जोडररस्ता, घाटकोपर – मानखुर्द जोडरस्ता आदी भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसले.
मुंबईकरांना पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये, यासाठी महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करते. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढला जातो. तसेच, पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढला जातो. मात्र, पालिकेच्या नालेसफाईवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. झोपड्पट्टी भागातील अनेक लहान – सहान नाल्यांमधील गाळ काढला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. असे असतानाच बुधवार ते गुरुवार या दोन दिवसांत मुंबईत ढगांच्या गडगडाटासह संततधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच, या अवकाळी पावसामुळे काही वेळातच पूर्व उपनगरातील बहुतांश भाग जलमय झाले होते.
वळवाच्या पावसांतच अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने महानगरपालिकेच्या नालेसफाई झाल्याच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाऊस सुरु झाल्यानंतर काही वेळातच गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, शीव, साकीनाका, कांदिवली, दहिसर, अंधेरी – घाटकोपर जोडररस्ता, घाटकोपर – मानखुर्द जोडरस्ता जलमय झाला. मुंबईकरांनी पाणी साचल्याच्या अनेक तक्रारी समाजमाध्यमवर करत नालेसफाईच्या कामाबाबत निराशा व्यक्त केली. गोवंडीतील कमला रमण नगर, बैंगणवाडीतील अनेक गल्लीबोळांमध्ये पाणी शिरले होते. तसेच, दरवर्षीप्रमाणे मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातही काही प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. कांदिवलीतील पोईसर परिसरातही साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला.
काही ठिकाणी नाल्यांलगत ठेवलेला नालेसफाईतील गाळ पुन्हा नाल्यांत वाहून गेला. नालेसफाईनंतर ४८ तास गाळ त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे असते. मात्र, त्यानंतर त्याची तातडीने विल्हेवाट लावणेही आवश्यक असते. मात्र, अनेक ठिकाणी गाळ उचलण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. त्या दिरंगाईचा फटका या अवकाळी पावसात बसला. नालेसफाईच्या नावाखाली मुंबईकरांच्या पैशांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप फैयाज शेख या तरुणाने केला.
महानगरपालिका प्रशासन नालेसफाईच्या नावाने दरवर्षी मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसते. प्रत्येक वेळी त्यांचे नालेसफाईचे दावे पावसात वाहून जातात आणि त्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो. मुळातच अवकाळी पाऊस कधीही पडू शकतो, त्यामुळे महानगरपालिकेने कायमच सज्ज राहायला हवे. मुंबईत नालेसफाई केवळ पावसाळ्यापुरती न करता बाराही महिने करायला हवी. मात्र, नालेसफाईत कायम दिरंगाई केली जाते, असा आरोप महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.