सायबर सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात वैयक्तिक ई-मेलऐवजी ई-स्वाक्षरीचा वापर कसा करता येईल यावर काम सुरू असल्याचे संकेत इंटरनेटचे जनक विंट सर्फ यांनी दिले. सध्या इंटरनेटमध्ये हॅकिंगचा सर्वात मोठा धोका आहे. यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानदृष्टय़ा अधिक विकसित होण्याची गरज असून ई-स्वाक्षरीचा वापर करून अधिक सुरक्षित कसा करता येईल यावर संशोधन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई आयआयटीमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्ट या वार्षिक तंत्रमहोत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्फ यांनी स्पष्ट केले. इंटरनेटचे जनक म्हणून ओळख असलेल्या सर्फ यांनाही १०० टक्के इंटरनेट समानता साधणे अवघड असल्याचे वाटते. इंटरनेट समानतेवर सध्या जगभर चर्चा सुरू आहे. याचवेळी इंटरनेटचे जनक यांनी केलेल्या या विधानामुळे इंटरनेट समानतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेट समानता करण्यासाठी आधी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मोबाइल इंटरनेटचा प्रवास टूजी ते फाइव्हजीपर्यंत पोहचला असला तरी वेगापेक्षा लोकांना त्याचा होणारा वापर महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणात सर्फ यांनी गुगलकार तंत्रज्ञानाबद्दल माहिती देत ही कार तयार करण्यामध्ये आलेल्या अडचणीही मांडल्या. याचबरोबर तंत्रज्ञानातील विविध पैलूंबाबत विद्यार्थ्यांना
माहिती दिली.

डॉ. माशेलकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
टेकफेस्टच्या दुसऱ्या दिवशी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी स्वच्छता मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले, तर जिनिवा येथील सर्न या वैज्ञानिक संस्थेतील वैज्ञानिकांनी मूलभूत विज्ञानाच्या संशोधनातून उपयुक्त तंत्रज्ञान कसे विकसित होते याची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. ‘सी++’  या संगणकीय भाषेचे जनक बजार्नी स्ट्राऊर्स्टप यांनी या संगणकीय भाषेच्या नव्या आवृत्तीमध्ये कोडिंगसाठी आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर करण्यात येईल असे स्पष्ट करत ही भाषा अधिक सोपी करण्यावर भर असल्याचे नमूद केले.