मुंबई : चौकशी सुरू करून खंडण्या वसूल करायच्या हा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांचा उद्योगच झाला आहे. ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील, असा इशारा मंगळवारी दिला़ ‘ईडी’चे अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानी याच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होत़े या खंडणीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वसुली ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईत केली आह़े यासंदर्भात ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. ‘ईडी’चे अधिकारी नक्कीच तुरुंगात जातील, असा इशारा राऊत यांनी दिला़ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत असून, दबाव आणण्यासाठी सध्या मुंबईत छापेसत्र सुरू आहे. ‘ईडी’नंतर सध्या प्राप्तिकर खात्याचे छापे सुरू आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता प्रत्येक प्रभागांमध्येही छापे पडतील, अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच पैसे हे काय फक्त आमच्याकडेच आहेत का? भाजपचे नेते काय मुंबईत कटोरा हातात घेऊन भीक मागतात का, असा खोचक सवालही राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मुंबईतील ‘ईडी’च्या खंडणी घोटाळय़ाचे सगळे तपशील २८ फेब्रुवारीला पाठवले आहेत. त्याचबरोबर याच पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलीस आयुक्तांकडे अरिवद भोसले यांनी तक्रार दाखल केली आहे. ‘ईडी’च्या अधिकाऱ्याने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलीच. शिवाय उत्तर प्रदेशातील ५० उमेदवारांना पैसेही पुरवल्याची माहिती मिळाली आहे, असे राऊत म्हणाल़े किरीट सोमय्या यांना लोकांविरुद्ध तक्रारी करायची सवय आहे. २०१५ मध्ये सोमय्या यांनी विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याची तक्रार जीव्हीके व एचडीआयएलविरोधात केली. एमएमआरडीएकडे वारंवार पत्र पाठवत त्यांनी तक्रारींचा सपाटा लावला. पण वर्षभरानंतर वाधवान यांच्यासह पुत्र नील सोमय्याला भागीदार करत जमिनीवरील विकासहक्क मिळवत हजारो कोटी रुपयांचा लाभ मिळवला. पीएमसी बॅंक घोटाळय़ात कारवाईची धमकी देऊन ही जमीन सोमय्या पिता-पुत्रांनी घेतली, असे सांगत सोमय्या पिता-पुत्र तुरुंगात जाणार हे निश्चित असे भाकित राऊत यांनी वर्तवले. ईडीकडून वसुलीचे राऊतांच्या पत्रातील तपशील - ईडीचे अधिकारी एखाद्या कंपनीची चौकशी सुरू करायचे. मग त्याच कंपनीच्या माध्यमातून काही दिवसांनी जितेंद्र नवलानी यांच्या ७ कंपन्यांच्या खात्यात पैसे जमा केले जायचे. २०१७ मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्सची चौकशी सुरू केली. त्यानंतर या कंपनीकडून नवलानीकडे २५ कोटी रुपये जमा झाले. त्यानंतर पुन्हा १५ कोटी रुपये जमा झाले. - अविनाश भोसले यांची ईडी चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडून नवलानीकडे १० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. ही काही उदाहरणे असून यादी अंतहीन आहे, असे सांगत राऊत यांनी त्याबाबतच्या कागदपत्रांची प्रत माध्यमांना दिली. तसेच हा नवलानी कोण व त्याचे भाजप नेत्यांशी काय संबंध आहेत, असा सवालही त्यांनी केला. खंडणीच्या वसुलीतील हा पैसा परदेशात मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात येत आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. ‘ईडी’च्या विरोधात केरळनंतर महाराष्ट्र सक्तवसुली संचालनाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी केरळ निवडणुकीपूर्वी डाव्या आघाडीचे नेते व काही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशी सत्र सुरू केले होते. तेव्हा डाव्या आघाडी सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात खोटी चौकशी करत असल्याच्या आरोपाखाली कोचीमध्ये गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी केरळातून भीतीने काढता पाय घेतला होता. केरळनंतर मुंबईत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात शुक्लकाष्ट लागू शकते. तसे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.