मुंबई : विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनात शक्तिप्रदर्शन होणार आहे. या अधिवेशनात कोणी कोणता पक्षादेश पाळायचा, यावरून शिवसेना आणि शिंदे गटात तीव्र संघर्षांची चिन्हे आहेत.

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. रविवारी अध्यक्षांची निवड, तर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे १०६ तर अपक्ष, छोटे पक्ष असे एकूण १२० आमदार भाजपच्या गटात आहेत. शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह ४६ आमदार आहेत. विधानसभेत सरकारला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पािठबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. यामुळे भाजपचे नार्वेकर निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार म्हणजे आवाजी पद्धतीने मतदान होईल. गेल्या डिसेंबरमध्ये महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा बदल केला होता. या नव्या बदलानुसारच ही निवडणूक होईल. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभे राहून मत नोंदवायचे आहे.

दावे-प्रतिदावे

शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा पक्षादेश लागू केला आहे. हा पक्षादेश शिंदे गटालाही लागू पडतो, असा शिवसेनेचा दावा आहे. तर पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड दोनतृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी केली असल्याने प्रभू यांचा पक्षादेश आम्हाला लागू होत नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे. उलट शिवसेनेच्या सर्वच आमदारांना गोगावले यांचा पक्षादेश लागू होतो, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे म्हणणे आहे. विधानसभा अध्यक्षपद किंवा विश्वासदर्शक ठरावावर प्रत्यक्ष मतदान झाल्यास हा कायदेशीर मुद्दा येणार आहे. यातूनच अध्यक्षांची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठराव हे दोन्ही आवाजी मतदानाने मंजूर केले जाण्याची शक्यता जास्त आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही आवाजी मतदानाने गोंधळातच विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला होता.

कोणाची सरशी?

’विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत.

’भाजपचे १०६ तर अपक्ष, छोटे पक्ष असे एकूण १२० आमदार भाजपच्या गटात, शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह ४६ आमदार

’सरकारला १७० पेक्षा जास्त आमदारांच्या पािठब्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. भाजपचे नार्वेकर यांच्याच निवडीची शक्यता.

कडेकोट बंदोबस्त

दोन दिवसांच्या अधिवेशनात शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वादावादी किंवा बाचाबाची होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. विधान भवनाच्या आसपास दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधान भवनात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.