दोन मुलांच्या मृत्यूने नैराश्य आल्याने एका वृद्धेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी भांडुप येथील सुभाष नगर येथे ही घटना घडली.
निर्मला प्रभाकर मुदलियार(६५) या भांडुप पश्चिमेच्या सुभाष नगर येथे राहात होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मोठय़ा मुलाचे निधन झाले. तर पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा लहान मुलगा आणि सूनचे आजारपणाने निधन झाले. त्यामुळे निर्मला यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांच्यासोबत राहणारी त्यांची नात नेहा(१७) डेंग्यूमुळे आजारी होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास निर्मला यांनी घराचे दार बंद करून अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी कुठलीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही.