कंटेनरमधील धागे चोरीच्या गुन्ह्य़ातून सुटका करण्यासाठी तीन लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
भिवंडी येथील अवचित पाडा परिसरात इस्तियाक मकबुल अहमद चौधरी (४५) हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यातील प्रमोद धाडवे, प्रविण जाधव, शैलेश गोल्हार आणि सतिश देसाई, या चार पोलीसांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांनी इस्तीयाक व त्यांचा मुलगा अब्दूल माबुद उर्फ सोनू आणि शेजारी राहणारा मेहफूज आलम यांना कंटेनरमधील धाग्यांची चोरी केल्याच्या संशयावरून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले आणि अब्दूल व मेहफूज या दोघांना मारहाण केली. ७ व ८  मे रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी इस्तीयाक यांनी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्याकडे तक्रार केली होती.