मुंबई : एका कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची अकस्मात धावती भेट झाल्याने अशोक चव्हाण काही आमदारांसह काँग्रेसला रामराम करणार या राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अशा प्रकारच्या बातम्या पसरवून काँग्रेस व आमच्या नेत्यांबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आशीष कुलकर्णी यांनी वरळी येथील आपल्या घरी गणपती दर्शनासाठी विविध पक्षांतील नेते, जवळचे कार्यकर्ते यांना निमंत्रण दिले होते. कुलकर्णी हे २००९च्या काळात विशेषत: अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यामुळे काँग्रेसमधील नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच कुलकर्णी गेली काही वर्षे भाजपमध्ये काम करत आहेत. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस हे कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते निघायच्या तयारीत असताना अशोक चव्हाण तेथे पोहोचले, तो योगायोग होता. त्या वेळी त्यांची भेट झाली. परंतु पाच मिनिटांत फडणवीस त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. या वेळी कसलीही राजकीय चर्चा झाली नाही, माध्यमांमधून चुकीच्या बातम्या प्रसारित होत असल्याचे आशीष कुलकर्णी यांनी सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोक चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

अशोक चव्हाणांशी भेट झालेली नाही- फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची भेट झाली नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.  ‘‘मी गणपतीच्या दर्शनासाठी एका ठिकाणी गेलो होतो आणि चव्हाणदेखील तेथे पोहोचले. मात्र, त्यांची आणि माझी कुठेही भेट झालेली नाही,’’ असे फडणवीस म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, विस्तार लवकरच होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुण्याचे पालकमंत्री होणार का? या प्रश्नाला फडणवीस यांनी नाही असे उत्तर दिले.

मुंबई परिसरात तिसरी महापालिका करण्याचाही विचार नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. राज्याला विकासाकडे न्यायचे आहे.

– देवेंद्र फडणवीस