अक्षय मांडवकर

वन विभागाची मोहीम थंड; हौशी पर्यटकांवर वचक नाही

गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा- उरण- अलिबाग या फेरी बोटींवरील प्रवाशांनी सीगल पक्ष्यांना फरसाण खाऊ घालू नये म्हणून वन विभागाने सुरू केलेली मोहीम थंडावली आहे. पक्ष्यांसाठी पर्यटक खाद्यपदार्थ हवेत भिरकावत असल्याचे आणि पक्षी ते उडता उडताच चोचीत झेलत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.

पक्ष्यांना असे पदार्थ खाऊ घालणे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अपराध आहे. या तेलकट पदार्थामुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. गतवर्षी ‘रॉ’ आणि ‘पॉझ’ या संस्थांनी वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे तक्रारी केल्या होत्या. कांदळवन विभागाने किनाऱ्यांवर जनजागृतीपर फलक लावले होते. तसेच वन कर्मचाऱ्यांकडून गस्तही घालण्यात येत होती. मात्र समुद्रकिनाऱ्यांवर सुरू असलेली ही मोहीम आता थंड पडली आहे. ‘फेरी बोटींच्या संघटनांना पत्र दिले आहे. बोटमालकांशी चर्चाही केली आहे. पर्यटक खाऊ घालत असतील तर लक्ष देऊ, असे वन परिक्षेत्र अधिकारी सीमा आडगावकर यांनी सांगितले.