नवाब मलिक यांची थेट घोषणाच, तर आदित्य ठाकरे यांचे ट्वीट 

मुंबई : राज्यातील करोनासाथ नियंत्रित करण्यासाठी येत्या १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याबाबत शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसताना संभाव्या मोफत लसीकरणाच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीत चढाओढ लागली आहे.

सर्वांना मोफत लस देण्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करून हा कार्यक्रम हाती घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी जाहीर केली. मलिक यांच्या घोषणेनंतर लगेचच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीटच्या माध्यमातून मोफत लस देण्याची घोषणा के ली. मात्र कालांतराने त्यांनी ही घोषणा मागे घेतल्याने आश्चार्य व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ४५ पेक्षा कमी वय असलेल्यांना केंद्र सरकार लसपुरवठा करणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा के ली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यातील लसीकरणाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. लसीकरणासाठी जागतिक निविदा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही तासांतच मोफत लस देण्याचा निर्णय झाल्याचे नवाब मलिक यांनी जाहिर के ले आहे.

मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीतही मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला होता. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. त्यांनतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली. मात्र नंतर त्यांनी हे  ट्वीट मागे घेत लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लसीकरण मोफत करावे, अशी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भूमिका असून त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, तेच निर्णय घेतील असे स्पष्ट के ले.

मुख्यमंत्र्यांचाही होकार?

मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीतही मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला होता. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.