मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोडय़ाच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी राजभवन गाठले.

‘‘माझा एकही माणूस माझ्याविरोधात उभा राहिला तर ते माझ्यासाठी लाजिरवाणे ठरेल. मला तो खेळच खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याचे पुण्य या बंडखोरांना मिळू दे. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत कधीही नव्हती. मी तुम्हाला सांगून मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षां’ निवासस्थान सोडले होते. आज सर्वासमोर मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद आमदारकीचाही त्याग करत आहे’’, असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे जाहीर केले. ‘‘मी घाबरणारा नाही, पण कारण नसताना शिवसैनिकांचे रक्त सांडू नये, ही इच्छा आहे. आता पुन्हा शिवसेना उभी करण्यासाठी शिवसेना भवनात बसणार असून तुमची साथ हवी आहे,’’ अशी भावनिक साद ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काही शिवसेना आमदारांसह सूरत गाठत बंड केले. त्यानंतर शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बहुतांश आमदार गुवाहाटीला गेले आणि दिवसागणिक बंडखोर आमदारांची संख्या वाढत  राहिली. शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदार आणि काही अपक्ष आमदार शिंदेगटात दाखल झाल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले. ‘परत या, चर्चा करून तोडगा काढू’ अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातली. पण, शिंदे गटाने त्यास दाद दिली नाही.

‘‘आपल्या आशीर्वादाने अडीच वर्षे वाटचाल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला निधी देऊन महाविकास आघाडी सरकारने कामकाजाला सुरुवात केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मोठा निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी केली. आज मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेतला. सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वांद्रे वसाहतीत हक्काचे घर मिळावे म्हणून भूखंड दिला. चांगले सुरू असते तेव्हा दृष्ट लागत असते तशी ती लागली,’’ असेही ठाकरे म्हणाले.

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध असेल असा प्रचार केला गेला. पण, आज नामांतर होत असताना त्यांनी पाठिंबा दिला. खेद एका गोष्टीचा की या नामांतराच्या निर्णयावेळी शिवसेनेचे केवळ आदित्य ठाकरे, मी, अनिल परब व सुभाष देसाई हे चौघेच मंत्री होतो. बाकी सगळे कुठे गेले हे तुम्हाला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘‘शिवसेना अनुभवत मोठा झालो. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकांना आमदार, मंत्री केले. माणसे मोठी झाली. ज्यांनी मोठे केले त्यांच्यावरच नाराज झाली. ज्यांना दिले ते नाराज व ज्यांना काहीच दिले नाही ते हिंमतीने आमच्याबरोबर आहेत. हीच शिवसेना आहे. याच नात्यांच्या जोरावर शिवसेना जिवंत राहिली व आव्हाने झेलत मोठी होत राहिली,’’ असे ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे आमदार कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर नाराज असतील तर आम्ही बाहेरून पाठिंबा देतो. तुमच्या लोकांना बोलावून पूर्ण शिवसेनेचे सरकार स्थापन करा, असा प्रस्ताव कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला, असेही ठाकरे यांनी नमूद केले. तुमची नाराजी नेमकी माझ्यावर, कॉंग्रेसवर की राष्ट्रवादीवर? असा सवाल ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना केला़  ती नाराजी ‘वर्षां’, ‘मातोश्री’वर येऊन सांगितली असती तर मी ऐकले असते. पण समोर येऊन बोलायला पाहिजे. ज्यांना शिवसैनिक मानले त्यांच्याशी वाद, लढाई कशासाठी करायची. शिवसैनिकांना घरातच ठेवण्यासाठी नोटीस देत आहेत. ज्या शिवसैनिकांनी तुमच्या विजयाचा गुलाल उधळला त्यांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते लाल करणार का, असा सवाल ठाकरे यांनी केला. कोणीही शिवसैनिकांनी रस्त्यावर येऊ नये, कारण लोकशाहीचा नवीन पाळणा हलणार आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्तेत आले. गेल्याच महिन्यात महाविकास आघाडी सरकारने निम्मा म्हणजे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचेच आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

राज्यपालांना टोला

‘‘गुरुवारी तातडीने बहुमत चाचणी घ्यावी, असा निकाल न्यायदेवतेने दिला आह़े  त्याआधी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचे निवेदन देताच राज्यपालांनी २४ तासांत लोकशाहीचे पालन केले. पण, १२ जणांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत त्यांनी गेल्या दीड वर्षांत निर्णय घेतलेला नाही,’’ असा टोला ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.

ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्यांना शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याचे पुण्य मिळू दे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला हे माझे पाप. त्याचे फळ मी भोगायला तयार आहे. आता पुन्हा शिवसेना उभी करण्यासाठी शिवसेना भवनात बसणार असून, तुमची साथ हवी आहे.   

– उद्धव ठाकरे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally resigned uddhav thackeray resigns chief minister legislative council member ysh
First published on: 30-06-2022 at 01:21 IST