पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केलं. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजपा कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केलं आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली. मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

मात्र पीएमसी बँकेच्या खातेदारांची बाजू मी आरबीआयच्या गव्हर्नरसमोर मांडेन. यातून काही तोडगा काढता येईल का याबाबत चर्चा करेन असं आश्वासन निर्मला सीतारामन यांनी दिलं.

आणखी वाचा- ‘न्याय मिळवून द्या’, पीएमसी बँक खातेधारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव

काय आहे प्रकरण?

पीएमसी बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावाधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसताना ही माहिती आरबीआयपासून लपवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. या सगळ्यामुळे ४३३५ कोटी रुपयांचा तोटा बँकेला झाला.  याच पैशांमधून हा गैरव्यवहार झाला. हा सगळा गैरव्यवहार हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीच्या पुढाकारातून झाला. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी केला.

यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा घोटाळा उघड झाला. याप्रकरणी आत्तापर्यंत १० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (निलंबित) जॉय थॉमस यांनाही अटक करण्यात आली.