खारफुटीची कत्तल केल्याप्रकरणी विनोदी कलाकार कपिल शर्माच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. बुधवारी कपिल शर्माविरोधात पर्यावरण संरक्षण कायदा आणि एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील वर्सोवामध्ये कपिल शर्माने बंगल्याजवळ खारफुटीची कत्तल करुन तिथे अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी कपिल शर्माविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कपिल शर्माने वर्सोवामधील कार्यालयाच्या इमारतीसोबतच गोरेगावमधील घराजवळही नियमांचे उल्लंघन करुन बांधकाम केल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच केला आहे. सप्टेंबरमध्ये कपिल शर्माने वर्सोवातील कार्यालयाच्या बांधकामासाठी महानगरपालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितली होती असे ट्विट केले होते. कपिलने ट्विटमध्ये थेट नरेंद्र मोदींना टॅग केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटची दखल घेत कपिलने पुरावे द्यावेत आम्ही चौकशी करु असे सांगितले होते. तर शिवसेनेने मात्र कपिल शर्मावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. कपिल शर्माने ज्या कार्यालयाच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप केला होता ते बांधकामच बेकायदा असल्याचे समोर आले होते. कपिल शर्मा रहिवासी जागेचा वापर व्यावसायिक कारणासाठी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यामुळे हे ट्विटराअस्त्र कपिल शर्मावरच उलटले होते.