मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ च्या वेळापत्रकात सोमवार, १८ ऑक्टोबरपासून बदल होणार आहे. मेट्रो रेल्वे गाडी सुटण्याच्या वेळेत वाढ करण्यात आली असून आता घाटकोपरवरून सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी पहिली गाडी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे. तर वर्सोव्यावरूनही सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटणारी पहिली गाडी आता सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. त्याच वेळी वर्सोव्यावरून रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी सुटणारी शेवटची गाडी, रात्री १० वाजून ३० मिनिटांनी आणि घाटकोपरवरून सुटणारी गाडी रात्री १० वाजून १५ मिनिटांऐवजी रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मेट्रो १ नव्याने नव्या नियमांसह वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवासी संख्या फारच कमी होती. पण आता मात्र या संख्येत वाढ झाली असून दिवसाला दीड लाख प्रवासी प्रवास करत असल्याचे एमएमओपीएलकडून सांगण्यात आले आहे.