मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ कलिंगड वाहून नेणाऱ्या गाडीने बंद पडलेल्या चारचाकी वाहनाला ढकलत नेणाऱ्या तरुणांना जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला. पहाटे पाचच्या सुमारास पनवेल परिसरातील आदई गावाजवळ ही दुर्घटना घडली. हे वाहन मुंबईच्या दिशेने येत होते. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानखुर्द येथील मंडळा गावात राहणारे तरुण एका मित्राच्या लग्नानिमित्त रात्री दीड वाजता पुण्याला निघाले होते. बोरला टोल नाक्यापुढे त्यांच्या वाहनातील इंधन संपल्यामुळे गाडी बंद पडली. इंधन भरून गाडी पुण्याच्या दिशेने नेत असताना आदई गावाजवळ ती पुन्हा बंद पडली. त्यामुळे या तरुणांनी पुण्याला जाणे रद्द केले. गाडीला धक्का देऊन ती पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवत असताना मागून वेगात आलेल्या कलिंगडाच्या टेम्पोने त्यांना आणि त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यात तीन जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. संतोष प्रजापती (४०), रशीद नफीज खान (२४), जुम्मन शौरतअली शेख (४५), दिनेश जैस्वाल (३०), अयोध्या यादव (२६) अशी मृतांची नावे असून रामचंद्र यादव (३०), संजय छोटेलाल राजभर (२८), मुंद्रिका प्रसाद जैस्वाल (३६) हे जखमी झाले आहेत. हे सर्व जण इंदिरानगर व मंडाळा मानखुर्द भागात राहणारे आहेत. या घटनेमुळे मानखुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.