महाराष्ट्रातील गड किल्ले हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा असून आमचे सरकार गड किल्ल्याच्या संवर्धनसाठी कटीबध्द आहे. त्यादृष्टीने गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारची एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केली.
महाराष्ट्रातील किल्ल्यांची संख्या सुमारे ३५० इतकी मोठी आहे. यापैकी ४९ किल्ले  हे राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर केंद्र सरकारने संरक्षक स्मारक घोषित केलेल्या किल्ल्यांची संख्या ही ४७ इतकी आहे अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्घ करुन देईल तसेच केंद्र सरकारकडून मिळणा-या निधीबाबत ही योग्य पाठपुरावा करेल असे सांगतानच किल्ल्यांच्या संवर्धनालाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये निनाद बेडेकर,ऋषीकेश यादव आदी तज्ज्ञ मंडळीचा समावेश असेल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.  केंद्राकडे किल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी असून केंद्राच्या अखत्यारातील किल्ल्यांसाठी राज्याकडून नक्कीच पाठपुरावा करु असे सांगतानाच तावडे म्हणाले की, खाजगी किल्ले जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न करण्यात येतील, तसेच कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्याचा विचार करण्यता येईल, कारण कायदे हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.