बुधवारी लोकसत्ता आरोग्यमान भव

मुंबई: बदलती जीवनशैली, आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक जाणवत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळेही गुंतागुंत वाढत चालली आहे. हृदयासंबंधित आजार वेळीच कसे ओळखावे, काळजी कशी घ्यावी यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्ताने बुधवारी (२९ सप्टेंबर) आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादात मिळणार आहेत. विख्यात हृदयशल्यविशारद आणि एच.एन.रिलायन्स रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अन्वय मुळे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार करोनापूर्व काळात भारतात जवळपास २८ टक्के मृत्यू हे हृदयरोगामुळे होतात. जीवनशैलीत बदल करून, आवश्यक काळजी घेऊन हृदयविकार टाळणे शक्य आहे. हृदयविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी पाळण्यात येणारा जागतिक हृदयरोग दिन डिजिटल माध्यमातून हृदयरोगविषयी जनजागृती, प्रतिबंध आणि व्यवस्थापन करणे या संकल्पनेवर आधारित आहे.

तरुण वयातच हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना घडताना  दिसत आहेत. धावपळीच्या दैनंदिन आयुष्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधताना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तरुणाईला सामोरे जावे लागत आहे.  मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिडचिड होण्याचे प्रमाण वाढले आहे. करोना साथीच्या काळात निर्बंध, घरून काम, कुटुंबाची काळजी यामुळे हे दडपण आणखीनच वाढले आहे. हा मानसिक ताण आपल्या हृदयावर परिणाम करत नाही ना? हे

परिणाम कसे ओळखायचे यावर

डॉ. मुळे वेबसंवादात मार्गदर्शन

करणार आहेत. तरुण वयातच हृदयविकार होऊ नये म्हणून जीवनशैलीमध्ये काय बदल करावेत हे देखील या संवादात समजून घेता येणार आहे.

करोना विषाणू हृदयावर आक्रमण करत असल्यामुळे बाधितांमध्येदेखील गुंतागुंत निर्माण झाल्याचे आढळले आहे.  ही गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून काही काळजी घेता येईल का याबाबत

डॉ. मुळे यावेळी मार्गदर्शन करतील.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे नोंदणी आवश्यक.

http://tiny.cc/LS_Aarogyamaanbhav_29Sep

कधी ? :  बुधवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता