बहुचर्चित पत्रा चाळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई गृहनिर्माण मंडळाने चार चटईक्षेत्रफळाचा लाभ घेण्याचे ठरविले आहे. याआधी हा प्रकल्प अडीच इतक्या चटईक्षेफळात मंजूर करण्यात आला होता. रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चटईक्षेत्रफळाचा आम्हालाही लाभ मिळावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र ते शक्य नाही, अशी मंडळांची भूमिका आहे.
हेही वाचा>>>मुंबई: नव्या वर्षात चार उपनगरीय स्थानकात सुविधांची रेलचेल
पत्रा चाळ प्रकल्पात ६७२ रहिवाशांच्या अर्धवट इमारती तसेच सोडतीत यशस्वी झालेल्यांच्या इमारतींचे काम पूर्ण करण्यासाठी मंडळाने १०० कोटींचे कंत्राट जारी केले आहे. प्रत्यक्षात या सर्व इमारती पूर्ण करण्यासाठी आणखी २०० कोटींची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने चार चटईक्षेत्रफळाचा वापर करण्याचे ठरविले आहे. तसे असेल तर आम्हीही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत १३ वर्षे घालविली आहे. भाडेही मिळत नसल्याने रस्त्यावर आलो आहोत. आमचा काहीही दोष नसताना ही शिक्षा आम्ही भोगत आहोत. आता वाढीव चटईक्षेत्रफळाचा जर म्हाडा वापर करीत असेल तर आम्हालाच नुकसानभरपाई म्हणून जादा क्षेत्रफळाचा लाभ द्यावा, अशी मागणी गोरेगाव सिद्धार्थ नगर रहिवाशी समितीने केली आहे. सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही म्हाडा त्रिपक्षीय करारातील अटी-शर्ती जुमानत नाही तसेच मनमानी कारभार करीत आहे, असा आरोप समितीने केला आहे.
जानेवारी २०१८पासून म्हणजे भाडे देण्याबाबत कोणतेही म्हाडाकडून लेखी उत्तर मिळालेले नाही. पुनर्वसनक्षेत्राच्या उर्वरित बांधकामाचे मार्च २०२२ पासून सुरुवात होऊनही त्रिपक्षीय कराराच्या अधीन राहून संस्थेशी म्हाडाने सुधारित करार केलेला नाही. म्हाडाच्या चुकीमुळे पत्राचाळवासियांची ८.६८ एकर जागा विकासक व म्हाडाने लाटल्याचा आरोप समितीने केला आहे.पत्रा चाळ प्रकल्पातील मूळ रहिवाशी तसेच सोडतीत यशस्वी झालेल्या रहिवाशांना घर देण्याला म्हाडाने प्राधान्य दिले आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांत संबंधितांना हक्काचे घर मिळू शकेल, असा विश्वास मुंबई गृहनिर्माण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केला.