मुंबई : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे (ओएनजीसी) पवनहंस हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी अरबी समुद्रात आपत्कालीन परिस्थितीमध्ये उतरवण्याची वेळ आली. या दुर्घटनेत ओएनजीसीचे तीन कर्मचारी आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

ओएनजीसीच्या पवनहंस हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीपासून सुमारे ६० नॉटिकल मैल अंतरावर मंगळवारी दुपारच्या सुमारास मुंबई हाय येथील सागर किरण तेल विहिरीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र तेल विहिरीवरील लॅंडिग क्षेत्रापासून सुमारे दीड किमी अंतरावर हेलिकॉप्टर उतरवावे लागले. या हेलिकॉप्टरमध्ये सात प्रवासी आणि दोन वैमानिक होते. फ्लोटर्सच्या सहाय्याने हेलिकॉप्टर काही काळ तरंगत राहिले. त्यावेळात भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि ओएनजीसी मदत पथकाने हेलिकॉप्टरमधील नऊ जणांना वाचवून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यातील चौघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले चार कर्मचारी बेशुद्ध झाले होते. त्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृतांमध्ये तीन ओएनजीसीचे नियमित कर्मचारी होते तर एक कंत्राटी कर्मचारी होता.

मदतकार्य कसे झाले?

सागर किरण तेल विहिरीजवळ समुद्रात हेलिकॉप्टर उतरल्यानंतर तत्काळ तटरक्षक दलाचे जहाज दुर्घटनास्थळी पाठवण्यात आले. तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि ओएनजीसीचे पथक यांनी एकमेकांच्या समन्वयाने मदत कार्य केले. सागरी मदत समन्वय केंद्राद्वारे आंतरराष्ट्रीय सुरक्षा जाळे सक्रिय केले. त्याचबरोबर मुंबईहून दुसरे जहाज मदतीसाठी पाठवण्यात आले. तटरक्षक दलाच्या विमानाद्वारे समुद्रात तराफे सोडण्यात आले होते, असे भारतीय तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले.