‘२ ऑक्टोबरपासून पालिका कचरा उचलणार नाही’ रोज शंभर किलोहून अधिक कचरानिर्मिती करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी स्वत:च्या कचरा विल्हेवाटीची जबाबदारी घेण्याची मुदत महिन्याभरावर आली असतानाही आतापर्यंत शहरातील एकूण संस्थांपैकी केवळ चार टक्के संस्थांनीच याबाबत पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यासाठी महानगरपालिकेकडून आता सर्व विभागांत मदत केंद्र सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी शुक्रवारच्या मासिक आढावा बैठकीत दिले. रोज शंभर किलोहून अधिक कचरानिर्मिती करणाऱ्या गृहनिर्माण संस्था तसेच व्यावसायिक संस्थांमधून दोन ऑक्टोबरपासून कचरा उचलला जाणार नसल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडून गेले सहा महिने जनजागृती करण्यात येत असून यासाठी पर्यायी तंत्रज्ञान व यंत्रांसंबंधी प्रदर्शनही भरवण्यात आली. मात्र रहिवाशांनी अजूनही घनकचरा व्यवस्थापनाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली नसल्याचे दिसत आहे. महापालिकेनुसार दररोज १०० किलोंहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या ५ हजार ३०४ सोसायटी तसेच व्यावसायिक संस्था आहेत. मात्र त्यातील अवघ्या चार टक्के म्हणजे २३४ सोसायटय़ांनीच पुढाकार घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे, असे मासिक आढावा बैठकीत आयुक्तांना सांगण्यात आले. ही संख्या वाढवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू केले जाणार आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून सर्व विभागांत मार्गदर्शनासाठी मदत केंद्र सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी बैठकीत दिले.त्याचप्रमाणे प्रत्येक विभागातील गटांनी सोसायटय़ांना भेटी देऊन आवश्यक मार्गदर्शन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. दरदिवशी ७ हजार ३०० मेट्रिक टन कचरा रहिवासी सोसायटय़ांसोबतच मोठय़ा झोपडपट्टय़ांमध्ये निर्माण होणारा कचरा त्याच भागात प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. सध्या शहरातून दरदिवशी ७ हजार ३०० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. ऑक्टोबर २०१७ पर्यंत या कचऱ्याचे प्रमाण ६ हजार ५०० मेट्रीक टनपर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.